भारतीय स्वातंत्र्यदिन

६१ वर्षांपूर्वी याच दिवशी आपले महान राष्ट्र शेकडो वर्षांच्या दास्याच्या श्रुंखलांतुन मुक्त झाले.
आजचा दिवस हा खरोखरी राष्ट्रीय सण आहे. मुक्त आनंद आणि अभिमानाचा आहे. मनामनामध्ये मंगल राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा आहे.
आज आपला देश दहशतवाद, जातीय तेढ, बेकारी, देशद्रोह, महागाई, भ्रष्टाचार, फुटिरतावाद, बाह्य आक्रमणे, लोकसंख्यावाढ, स्त्रियांवर अत्याचार, भ्रूणहत्या आणि अशाच अनेक जीवघेण्या रोगांशी संघर्ष करतो आहे. हा जीवन मरणाचा संघर्ष आहे या बद्दल शंकाच नाही. एका प्रचंड अश्या सार्वजनिक नैराश्याने आपल्या राष्ट्रीय जीवनावर कृष्णछाया टाकलेली आहे.
पण आजचा दिवस हा या सर्व नैराश्याला बाजूला ठेवून स्वातंत्र्याच्या मुक्त आनंदतुन या सर्व समस्यांशी लढा उभारण्याची शक्ति देणारा आहे.
आजचा दिवस आपल्या राष्ट्राच्या भौगोलिक एकसंधतेच्या पुण्यस्मरणाचा सुद्धा आहे. जगाच्या इतिहासात आनंद आणि दुःख यांचे इतके एकजीव मिश्रण असणारे क्षण क्वचितच येतात. ६१ वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या राष्ट्राचे क्रूरतेने तुकडे करण्यात आले. जिथे आपल्या पूर्वजांनी आपल्या राष्ट्राचा आणि पर्यायाने एका श्रेष्ठ मानवी अस्तित्वाचा पाया रचला तो भूभाग आणि जिने आपल्याला ओळख दिली ती पवित्र, जीवनदात्री सरिता आपल्यापासून हिरावून घेण्यात आले. राष्ट्र आणि संस्कृति टिकवण्यासाठी केलेला तो त्याग आपण सदा लक्षात ठेवला पाहिजे.
आपल्या गौरवशाली इतिहासातून आपण प्रेरणा घ्यावी आणि एका शक्तिशाली आणि समृद्ध अशा भविष्याकडे आपली वाटचाल व्हावी हीच त्या जन गण मनांचा अधिपति, भारताच्या भाग्यविधात्याच्या चरणी प्रार्थना!!!

निखिल पुजारी.

Comments

Popular posts from this blog

नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!

स्ट्रॉबेरी

भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!