Posts

Showing posts from August, 2009

'एकादशीच्या घरी शिवरात्र'

जसवतसिंगांची हकालपट्टी झालीच शेवटी. हे तसे तर फार आधीपासूनच ठरले होते. लोकसभा निवडणूकीतल्या मानहानीजनक पराभवानंतर बहुतांश भाजप नेत्यांचे डोके फिरल्यागतच झाले होते. जसवंतसिंगानीही त्याच न्यायाने वागत जराश्या वेगळ्या पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच. तसे पाहिले तर लोकसभा निवडणूकांनंतर पक्षश्रेष्ठींना पत्रे पाठवून त्यांनी भाजपाच्या चिंतनशीलतेविषयी, पराभवाच्या जबाबदारीविषयी जेव्हा प्रश्ने उपस्थित केली तेव्हाच कमळावरचे भुंगे चिडले. हकालपट्टीच्या निर्णय म्हणजे सगळ्या भुंग्यांनी एका फरफटलेल्या दुस-या भुंग्याला चावा घेतला असेच म्हणावयास हवे! पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्धी स्वतःकडे खेचून घेणे जसवंतसिंघांना काही नवीन नाही. ए कॉल टू हॉनरःइन सर्विस ऑफ इमर्जंट इंडिया ह्या पुस्तकातही त्यांनी वादग्रस्त विधाने खळबळ उडवून दिलीच होती. हातात सत्ता नसली म्हणजे लेखणी सुद्धा फरफटते हयाचेच हे द्योतक आहे. जिना आणि फाळणीचा चघळून चघळूनही न संपलेला प्रश्न पुन्हा उपस्थित करून जसवंतसिंघांनी नेमके काय साधले कुणास ठावूक? त्यांच्या ह्या असल्या आशाळभूत वर्तनावर ताशेरे ओढणे साहजिकच होते. पण एक बाब इथे लक्षात घ्य

कोणी कुणाचा नातलग लागू नये

कोणी कुणाचा नातलग लागू नये, तरीही प्रापंचिक अपघातात फ्रॅक्चर झालेल्या खांद्यावरून जमेल तितक्यांच्या वजनदार तिरडयांना शेवटचे गावदर्शन करवून सुखरूप पोहोचवून यावे सरकारी स्मशानात. कोणी आपल्या एकटेपणाचा सबळ पुरावा मागीतलाच तर लिहून दाखवाव्यात त्याला अश्या कविता स्वत:च्या सहीनिशी झोकदार. किंवा वर्षातून एकदा एकटेच देहू,आळंदी,पंढरपूर ची करावी आत्मशोधार्थ वारी. तरीही त्यांतल्या त्यांत चार बळकट खांद्यांची सांधेदुखी जिद्दीने पोसावी - आपल्या एकांत-मढ्याचा भार बळजबरीने सोसणारी.

"वरातीमागून घोडे"

"वरातीमागून घोडे" ह्या म्हणीचा प्रत्यय पुन्हा गेल्या आठवड्याभरात सगळयांनाच आला असेल. देशात आणि विशेषतः पुण्यात स्वाईन फ्लू चे जे थैमान चालू आहे त्याने सरकार जनतेच्या आरोग्याविषयी किती संवेदनशील आहे हेच दिसून येते. कोणी म्हणेल सरसकट नेहमीच सरकारी यंत्रणेवर खापर फोडून आपण मोकळे होते. पण हे तसे नाही. लोकांनी कुणाकडे बघायचे? का नशिबाला दोष देत डोके फोडत बसायचे? ज्या वेळेस ही साथ अमेरिका, मेक्सिको मध्ये सक्रिय होती तेव्हाच तातडीने काही उपाय योजले असते तर आज ही भित भित जगायची वेळ आलीच नसती. पण आम्ही, आमचे सगळे चॅनेल्स राखी सावंतचे लगीन होईल् का, कोणासोबत होईल ह्यातच आपले सगळे कव्हरेज खर्ची घालत होते. "जनजागॄती"ची प्रक्रिया ही काही एकदोन दिवसांची नसते. तिला ठोस कार्यक्रम असावा लागतो हे ना आमच्या राज्यकर्त्यांना कधी कळले ना जनतेने कधी स्वतःहून त्यात उत्साह दाखविला. आज देशाच्या महत्वाच्या एकामागून एक शहरात स्वाईन फ्लू चे हातपाय पसरत चालले आहेत. अपुरी यंत्रणा, प्रचंड लोकसंख्या, औषधांचा तुटवडा, धास्तावलेली जनता ह्यामुळे हे चित्र अत्यंत विदारक झाले आहे. शाळा बंद ठेवाव्यात की

ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात…

ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात माझ्यातल्या चौथ्या डायमेन्शनपर्यंत पेटलेला तुझा अमलताशी स्पर्श… किती छळशील अजुन…?? अद्याप माझ्या हद्दीत आला नाहीये आयुष्याच्या नाक्यावर तुफान कोसळणारा पावसाळा आणि तुझ्या स्पर्शासक्त आठवणींचं अक्षरश: लगेज कॅरी करण्यासाठी स्वत:चीच सावली जकात म्हणून द्यावी लागणारंय मला. माझ्या धमन्यांच्या उष्माघातकी रस्त्यावरून उर फुटेस्तोवर धावतेय एक सावली तुझ्यातुझ्यापर्यंत… मी ऋतूंच्या स्टेजवर उभा असलेला कदाचित शेवटचा शोकांतसम्राट. किती छळशील अजुन…?? ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात…

नकळत

जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ… अगदी जमल्यासच (आणि लक्षात राहिलंच तर) फक्त तुझ्या श्वासांची एक पाकळी पाठवून दे माझ्याकडे असं म्हणालो होतो माझ्याही नकळत. माझं हे ‘नकळत’पणच तू इतकं मनावर घेतलंस की, समर्पणाची देठं लावलेल्या लक्षावधी फुलांची वादळं घेऊन आलीस माझ्या देहाच्या देशात! जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…

मुक्ती-२

मरणोत्तर मुक्तीच्या माझ्या घरापर्यंत चालत आलेल्या ऑफर्स मी लावतोय धुडकावून. जगण्याची बंधनं समजून घेतानाच्या होणार्‍या दमछाकीला आता कुठे उकलताहेत माझ्या श्वासांच्या गाठी. स्वातंत्र्याच्या गर्भातली ऊब मी नव्याने अनुभवतोय पूर्वीपेक्षा जास्ती प्रेमाने. प्रिय वास्तवा, माझ्या शापित कवितेला लाभू दे नितांत सुंदर उ:शाप अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा.

मुक्ती-१

हल्ली, शब्दांच्या पिंडाला शिवता शिवत नाहीत अर्थाचे कावळे आणि भाषेच्या श्राद्धवजा पुण्यस्मरणाची तयारी करून कवितेचा मुक्तीसाठीचा धिंगाणा विखुरतोय जगण्याच्या स्मशानभर!